॥ श्री गुरुदेव दत्त ॥ ॥ अनसूया मातायै नमः ॥ रजि. नं. ए-२४६ (नांदेड)

अध्यात्मिक यात्रा

श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमेचे माहात्म्य

माहूरगड पंचक्रोशी परिक्रमा

🕉
श्रावण शुक्ल चतुर्दशी आणि नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) माहूरगड, नांदेड
श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमेचे माहात्म्य

“श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमेचे माहात्म्य”

• "परिक्रमा महा महात्मा, सह्याद्रीशी जावे।

जीवन मुक्त व्हावे, श्री दत्त भेटावे जीवलगा॥"

• कालीका खंड व सह्यांद्री खंड (स्कंद पुराण) या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रथम सृष्टीची निर्मिती होण्या अगोदर सात कोस आवरस चौरस (हल्ली माहूरगड) त्यावेळीचे (आमली ग्राम असा उल्लेख आहे.) सृष्टी निर्मिती केली व त्यानंतर सर्व सृष्टीची रचना झाली.

• पवित्र काळ: श्रावण शुक्ल चतुर्दशी आणि नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) या महापर्वाच्या शुभमुहूर्तावर ही परिक्रमा आयोजित केली जाते.

• देवतांचा वास व महिमा: या दिवशी ३३ कोटी, सव्वा लक्ष आणि एकशे दहा देवता गुप्त रूपाने पंचक्रोशीत प्रदक्षिणा/परिक्रमा करतात, असा प्राचीन धार्मिक उल्लेख आढळतो.

• पूजा व अभिषेक: सह्याद्री पर्वताच्या कडेकपाऱ्यांमध्ये आणि निसर्गरम्य परिसरात विराजमान असलेल्या विविध देवी-देवतांना सर्व तीर्थांच्या जलाचा विधिवत अभिषेक व पूजा केली जाते.

• परिक्रमेचा उद्देश:

o भगवान श्री दत्तात्रेयांची असीम कृपा आणि प्रसन्नता प्राप्त करणे.

o जन्मांतराची पापे नष्ट करून आत्मशुद्धी मिळवणे.

o जीवाला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो.

• प्रदक्षिणेचा भावार्थ: दत्तात्रयांचे सतत नामस्मरण करत करत परमेश्वराभोवती केवळ शारीरिक चालणे नव्हे, तर पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाने घातलेला तो एक पवित्र वेढा (प्रदक्षिणा) मानला जातो.

सह्याद्री: एक जागृत तपोभूमी

• चारही युगांतील अस्तित्व: सत्ययुगापासून कलियुगापर्यंत अनेक अवतार झाले आणि आपापले कार्य पूर्ण करून गुप्त झाले; परंतु भगवान श्री दत्तात्रेय हे 'अमर आणि अवधूत' स्वरूपात आजीव भक्तांच्या कल्याणासाठी सह्याद्रीच्या कुशीत प्रत्यक्ष विराजमान आहेत.

• साधकांची सिद्धीभूमी: अनेक ऋषी, मुनी, साधू-संत आणि तपस्वी यांनी आपल्या तपासाठी सह्याद्रीची निवड केली, याठिकाणी साक्ष्यात दत्त महाराजांचे अस्तित्व असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात.

परिक्रमेचे मानवी जीवनातील फलित

• पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य: केवळ श्रद्धेने आणि भक्तीभावाने ही पंचक्रोशी परिक्रमा पूर्ण केल्यास संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे महापुण्य प्राप्त होते, अशी दृढ श्रद्धा आहे.

• पापनाश आणि आत्मशुद्धी: कठीण वाट तुडवत, शारीरीक कष्ट सहन करत व दत्तात्रयांचे नामस्मरण जेव्हा भाविक पुढे जातो, तेव्हा त्याच्यातील अहंपणा गळून पडतो आणि जन्मांतराची पापे नष्ट होऊन आत्मिक शांती लाभते.

• मोक्षप्राप्तीचा मार्ग: संसाराच्या व्याधी आणि मानसिक त्रासांतून मुक्ती मिळवून, जीवाला परमेश्वराशी जोडणारा आणि मोक्षाची वाट सुलभ करणारा हा एक अत्यंत पवित्र योग मानला जातो.

"दत्त दिगंबर दैवत माझे, सह्याद्रीची शान |

पंचक्रोशी फिरता लाभे, आत्म्यास समाधान ||"

१. परिक्रमेचा प्रारंभ आणि विधी

• एकत्र येण्याचे ठिकाण: श्रावण शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजता सर्व भाविक, साधू-संत आणि तपस्वी 'सर्वतीर्थ' या पवित्र ठिकाणी एकत्र जमतात.

• आशीर्वाद व मार्गदर्शन: भगवान श्री दत्तात्रेयांचा ध्यास घेऊन आणि परमपूज्य महंत महाराजांच्या आज्ञेने तसेच दत्तशिखर संस्थानातील साधू-संतांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली या परिक्रमेची नियोजनबद्ध सुरुवात होते.

• साधु संगाबरोबर केलेली परिक्रमाच जीवाला मोक्ष देऊ शकते.

• नैवेद्य व प्रस्थान: भगवान श्री दत्तात्रेयांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर, सायंकाळी ६ वाजता दत्तशिखरावरून अधिकृतपणे पंचक्रोशी परिक्रमेस प्रारंभ होतो.

२. सातत्यपूर्ण नामस्मरण आणि अखंड साधना

• नामस्मरणाचा महिमा: परिक्रमा सुरू झाल्याच्या क्षणापासून ती पूर्ण होईपर्यंत भाविक 'श्री गुरुदेव दत्त' या मंत्राचा सतत जप करतात.

• पापनाश व मोक्षप्राप्ती: परिक्रमेदरम्यान पावलोपावली केले जाणारे हे अखंड नामस्मरण मानवाचे सर्व जन्मांतरांचे पाप नष्ट करते आणि आत्म्याला थेट मोक्षाच्या मार्गाकडे घेऊन जाते, अशी दृढ आख्यायिका आणि भक्तांची श्रद्धा आहे.

"दत्तशिखरी ध्वज फडके, सर्वतीर्थाचा महिमा अगाध |

नामस्मरणात लीन होता, तुटे संसाराचा बाध ||"

दत्तशिखरावरून सुरू होणारा हा भक्तीचा प्रवास केवळ पायी चालणे नसून, ती एक अखंड नामसाधना आणि आत्मशुद्धीची पर्वणीच आहे.

१. कमंडलू कुंड (पहिले महत्त्वाचे स्थान)

• पौराणिक संदर्भ: हे पवित्र तीर्थ भगवान श्री दत्तात्रेयांचे दिव्य कमंडलू मानले जाते.

• महत्त्व: परिक्रमेच्या सुरुवातीलाच या तीर्थाचे दर्शन घेऊन व पवित्र जल प्राशन (ग्रहण) करून भाविक अध्यात्मिक ऊर्जेने पुढील कठीण प्रवासाला निघतात.

२. काळेश्वर तीर्थ

• मार्ग: दत्तात्रेयांचा डोंगर ओलांडून परिक्रमा श्री अनसुया माता मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या काळेश्वर तीर्थाकडे जाते.

• पौराणिक कथा: जेव्हा माता अनुसयांनी आपल्या पतिव्रत्य धर्माच्या सामर्थ्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना बालरूप दिले, तेव्हा त्यांनी त्या बालकांच्या डोळ्यांत काजळ घातले. त्यानंतर ज्या ठिकाणी माता अनुसयांनी आपले हात धुतले, तिथे हे 'काळेश्वर तीर्थ' तेव्हापासून प्रकट झाले अशी दृढ श्रद्धा आहे.

३. श्री दत्तपादुका दर्शन (प्रभू श्रीरामांचे पावन स्थान)

• पौराणिक संदर्भ: वनवास काळात भगवान श्रीराम, माता सीता आणि श्री लक्ष्मण या मार्गावरून जात असताना खुद्द भगवान श्री दत्तात्रेयांनी त्यांना येथे दिव्य दर्शन दिले होते.

• महत्त्व: या अत्यंत पावन आणि ऐतिहासिक स्थळी स्थित असलेल्या श्री दत्तपादुकांवर भाविक नतमस्तक होतात आणि भगवान श्री दत्तात्रेयांचा कृपाशीर्वाद प्राप्त करतात.

"कमंडलूचे पावन जल, काळेश्वर तीर्थाचा महिमा अगाध |

दत्तपादुकांस मोरचा, लाभे प्रभू श्रीरामांचा प्रसाद ||"

श्रद्धा, इतिहास आणि भक्तीचा हा संगम भाविकांच्या मनातील भाव अधिक दृढ करतो आणि परिक्रमेचा पुढील प्रवास सुकर बनवतो

४. आनमळ महादेव

• महत्त्व: भगवान शंकरांनी स्वतः या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती, अशी पुराणात कथा आहे.

• विशेषता: शंकरांच्या तपाने पुनीत झालेले हे स्थान अत्यंत जागृत आणि असीम अध्यात्मिक ऊर्जा प्रदान करणारे मानले जाते.

५. सयामाता आणि शांडिल्य ऋषींची तपोभूमी. (ब्रम्हमुहुर्त वेळ ३ वाजता पोहचते)

• स्थान: अत्री अनसुया माता यांच्या मंदिरापासून पश्चिमेकडील उंच पर्वतावर हे पावन स्थान वसलेले आहे.

• पौराणिक संदर्भ: सयामाता या माता अनुसयांच्या धाकट्या भगिनी मानल्या जातात. महर्षी शांडिल्य आणि अनेक ऋषी-मुनींनी येथे दीर्घकाळ तपश्चर्या केली आहे.

• अनुभूती: या पर्वतीय तपोभूमीत अत्यंत शांतता आणि अध्यात्मिक चेतना लाभते.

६. गरुडगंगा तीर्थ

• मार्ग: ईशान्य दिशेने पर्वत उतरून भाविक गरुडगंगेपाशी पोहोचतात.

• विधी: या पवित्र तीर्थात स्नान, पूजन आणि दर्शन करून भाविक प्रवासाचा क्षीण घालवतात व पुढील प्रवासासाठी ताजेतवाने होतात.

७. मवाळ तलाव (मातृतीर्थ – श्री रेणुकामाता गडाचा पायथा) (सकाळी ५ वाजता)

• स्थान: उत्तर दिशेकडे श्री रेणुका माता गडाच्या पायथ्याशी हे तीर्थ आहे.

• पौराणिक कथा: भगवान श्री परशुरामांनी स्वतः या मवाळ तलावाची (मातृतीर्थ) निर्मिती केली होती.

• विधी: मातृतीर्थाचे पूजन करून भाविक भगवान परशुरामांच्या चरणी कृतज्ञता आणि प्रार्थना अर्पण करतात.

८. विष्णूकवी मठ आणि सिद्ध रामतीर्थ (पहाटे ५:३०)

• वेळ: परिक्रमा पहाटे साधारण ५:३० वाजता विष्णूकवी मठ येथे पोहोचते.

• पौराणिक संदर्भ: कालिका खंड व सह्याद्री खंडात असा उल्लेख आहे की, खुद्द ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांनी या रामतीर्थावर १०,००० वर्षे तपश्चर्या केली होती.

• विश्रांती: अत्यंत सिद्ध मानल्या गेलेल्या या रामतीर्थाचे पूजन व दर्शन घेऊन भाविक सकाळी काही काळ विष्णूकवी मठात विश्रांती घेतात.

9. महर्षी जमदग्नी ऋषी समाधीस्थळ दर्शन

• दर्शन: विश्रांतीनंतर उत्तर दिशेने मार्गस्थ झाल्यावर, पश्चिमेकडे काही अंतरावर महर्षी जमदग्नी ऋषींचे पवित्र समाधीस्थळ लागते.

• भाव: परिक्रमेचा मूळ मार्ग तिथे थेट जात नसला, तरी सर्व भाविक दुरूनच या महान ऋषींच्या समाधीला अत्यंत श्रद्धेने नमन करतात.

पहाटेच्या मंगल समयी रामतीर्थ आणि विष्णूकवी मठातील हा प्रवास भाविकांच्या आत्म्याला अलौकिक समाधान देऊन जातो.

१०. क्षेत्रपाल श्री झंपटनाथ

• महत्त्व: जसे काशी नगरीचे रक्षण भगवान कालभैरव करतात, तसेच श्री क्षेत्र माहूरगडाचे रक्षण क्षेत्रपाल श्री झंपटनाथ करतात. झंपटनाथांचे दर्शन केल्याशिवाय यात्रा सफल होत नाही.

• श्रद्धा: झंपटनाथांच्या कृपेने या क्षेत्रातील सर्व तीर्थे, देवस्थाने आणि तपोभूमी सुरक्षित राहतात. भाविक त्यांचा आशीर्वाद घेऊनच पुढे मार्गस्थ होतात.

११. माहूरगडचे ग्रामदैवत श्री बजरंगबली

• विधी: क्षेत्रपालांच्या दर्शनानंतर परिक्रमा माहूरगडाचे ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमानाच्या मंदिरात पोहोचते. भाविक मारुतीरायाचे विधीवत पूजन करून बळ व भक्तीचा आशीर्वाद घेतात.

१२. महर्षी कपिलमुनी आश्रम (कपिलषष्ठीचा चमत्कार)

• पौराणिक संदर्भ: महर्षी कपिलमुनी हे माता अनसुयांचे बंधू असुन

• अद्भुत आख्यायिका: दर ६० वर्षांनी येणाऱ्या कपिलषष्ठी योगाच्या अतिपवित्र मुहूर्तावर या आश्रमातील विहिरीचे पाणी काही काळासाठी दुधात रूपांतरित होते, अशी प्राचीन लोकश्रद्धा आहे.

१३. नाथपंथीय भक्तांचे स्थान (सोनापीर व कवड्या पीर)

• वैशिष्ट्य: श्री दत्तप्रभूंच्या सर्वसमावेशक नाथपंथाची आणि दत्तपरंपरेची प्रचिती देणारे सोनापीर दर्गा व कवड्या पीर हे स्थान भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या ठिकाणी परिक्रमा येऊन दर्शन घेऊन पुढे पांडवलेणीवर जातात.

१४. पांडव लेणी (महाभारतकालीन वास्तव्य)

• इतिहास: वनवास काळात पांडवांनी या गुहांमध्ये वास्तव्य करून साधना केली होती. या ऐतिहासिक व पवित्र गुहांचे दर्शन घेऊन परिक्रमा पुढे निघते.

१५. भानूतीर्थ (सूर्यतीर्थ) व श्री खोलेश्वर मंदिर

• भानूतीर्थ: सूर्यनारायणाच्या ऊर्जेचे प्रतीक असलेले पवित्र स्थान. या ठिकाणी इंद्रासहित अनेक तपचर्या केली

• श्री खोलेश्वर मंदिर: महर्षी दैवल्य ऋषींनी स्थापन केलेल्या देवदेवेश्वरी श्री खोलेश्वर मंदिराचे दर्शन भाविक घेतात.

• महर्षी देवल्यऋषीचे महात्म्य :- देवल्यऋषीमुळेच भगवान दत्तात्रय दररोज निद्रेकरीता देवदेवेश्वरीवर जातात.

१६. बद्रिका आश्रम व कैलास टेकडी (कठीण प्रवास)

• देवदेवेश्वरीच्या पुर्व दिशेला कालिका खंडामध्ये उल्लेखिलेल्या पवित्र स्थळामध्ये बद्रिका आश्रम आहे.

• बद्रिका आश्रम: प्राचीन तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शास्त्राधारित स्थळाचे पूजन केले जाते.

• कैलास टेकडी प्रदक्षिणा: अत्यंत कठीण व तीव्र डोंगराळ रस्ता पार करून भाविक भगवान दत्तात्रेयांची तपोभूमी मानल्या जाणाऱ्या कैलास टेकडीला पोहोचतात. तिथे पूजन करून संपूर्ण कैलास टेकडीला प्रदक्षिणा घालतात व पुढे अग्नेय दिशेला दुपारी १२ ते १ च्या दरम्यान श्री वंजारेश्वरला परिक्रमा पोहचते.

१७. श्री वंजरेश्वर महादेव (सध्याचे नाव: शेखफरीद)

• पुराणातील उल्लेख: सह्याद्री खंड आणि कालिका खंड या पुराणांमध्ये या स्थानाचा 'श्री वंजरेश्वर महादेव' म्हणून स्पष्ट उल्लेख आढळतो.

• वर्तमान स्वरूप: प्राचीन काळापासून वंजारेश्वर नावाने ओळखले जाणारे हे स्थान वर्तमानात 'शेखफरीद' या नावानेही संबोधले जाते. भाविक येथे महादेवाला नमन करून पुढे जातात.

१८.श्री दत्त मांजरी व जुना वाडा

• श्री दत्त मांजरी: परिक्रमा पश्चिम दिशेकडील श्री दत्त मांजरी या गावात प्रवेश करते. तेथील ग्रामदैवत श्री हनुमानाचे (बजरंगबली) भाविक विधिवत पूजन व दर्शन करतात.

• जुना वाडा श्री दत्त मंदिर: गावालगत असलेल्या ऐतिहासिक वाड्यातील श्री दत्तप्रभूंच्या मंदिराचे दर्शन घेऊन परिक्रमा पुढे मार्गस्थ होते.

19. अत्रिकुंड आणि महर्षी अत्री महाराज मंदिर

• अत्रिकुंड: अनसुया माता मंदिराकडे जाताना लागणाऱ्या या पवित्र कुंडाचे पूजन केले जाते. हे स्थान ब्रह्मर्षी अत्री महाराजांच्या घोर तपश्चर्येची साक्ष देते.

• श्री अत्री महाराज मंदिर: त्यानंतर भाविक महर्षी अत्रींच्या मूळ मंदिरात नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन परिक्रमापुढे जाते.

२०. श्री अनसुया माता व श्री अन्नपूर्णा माता मंदिर

• माता अनसुया दर्शन: पतित्रत्याचे महान प्रतीक असलेल्या जगन्माता श्री अनसुया देवींचे दर्शन घेऊन, पूजन आणि प्रार्थना केली जाते.

• माता अन्नपूर्णा दर्शन: अनसुया माता मंदिराजवळच असलेल्या अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेऊन भाविक जीवनात सुख, समृद्धी आणि तृप्तीची याचना करतात.

२१. सर्वतीर्थ – महाआरती व परिक्रमेची सांगता

• प्रस्थान: सर्व प्रमुख तीर्थांचे दर्शन घेतल्यानंतर परिक्रमा पुन्हा उत्तर दिशेला दत्तशिखराच्या पायथ्याशी असलेल्या 'सर्वतीर्थ' या ठिकाणी दुपारी ३ ते ४ च्या वेळस पोहोचते.

• तीर्थप्राशन: भाविक पुनश्च सर्वतीर्थाचे पूजन करून पवित्र जल प्राशन करतात.

• सांगता सोहळा: परमपूज्य महंत महाराजांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भगवान श्री दत्तात्रेयांची महाआरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना आणि मंगलाशीर्वाद घेऊन या श्री दत्त पंचक्रोशी परिक्रमेची विधिवत सांगता केली जाते.

🌺 परिक्रमेची महाफलश्रुती

श्रद्धा, भक्ती, निस्सीम समर्पण आणि नामस्मरणाने ही परिक्रमा पूर्ण करणाऱ्या भाविकाला खालील अध्यात्मिक फळ प्राप्त होते अशी दत्त संप्रदायात अखंड श्रद्धा आहे:

• आत्मशुद्धी: मन, बुद्धी, अहंकार आणि शरीराची पूर्ण आत्मशुद्धी होते.

• पापनाश: जन्मांतराचे आणि पूर्वजन्मीचे सर्व दोष व पापे भस्मसात होतात.

• मोक्षप्राप्ती: भक्ताच्या जीवनातील संकटे दूर होऊन त्याला अंतिम शांती आणि मोक्षाचा सुकर मार्ग लाभतो.

गुरुपौर्णिमा सोहळा

वार्षिक आध्यात्मिक मेळावा

🕉
आषाढ पौर्णिमा श्री दत्त मंदिर, माहूरगड

गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थानात विशेष पूजा, अभिषेक व प्रवचनाचे आयोजन केले जाते. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था असते.

×